मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात ४७ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस काल पडला. तसेच मंत्रालयातील प्रमुख तीन प्रवेशद्वारावर निसर्गाने अवकृपा दाखविल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यामुळे अखेर या १५ टक्के उपस्थिती राहीलेल्या बहुतांष अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला.
काही महिन्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिन्ही मार्गावरच्या उपनगरीय रेल्वे गाड्या बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे अनेक सरकारी आणि खाजगी आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना आपल्या मुळ कार्यालयातच मुक्काम करावा लागला होता. त्यानंतर जवळपास ७ ते ८ महिन्यानंतर काल पुन्हा पावसामुळे आणि मंत्रालय आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे १५ टक्केने उपस्थित राहीलेल्या सरकारी कार्मचाऱ्यांना मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला.
मंत्रालयाच्या आरसा गेट परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने अनेकांना या गेटने बाहेर पडता आले नाही. तर नवीन प्रशासकिय इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वारावर पावसामुळे झाड कोसळले. त्यामुळे हे प्रवेशद्वार बंदच ठेवण्यात आले. तर गार्डन गेट प्रवेशद्वाराकडेही झाडाच्या फांद्या पडून अडथळा निर्माण झाला होता. तर त्याच्या पुढीलबाजूस असलेल्या एका गाडीवर झाड कोसळून वाहनाचे नुकसान झाले. त्यातच रात्रो उशीरापर्यंत या भागात पावसाचा जोर कायम राहील्याने मंत्रालयात जाणे आणि बाहेर पडणे जिकरीचे झाले होते.
त्यामुळे अखेर प्रशासनाकडून कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना मंत्रालयातच थांबण्याची मुभा दिली. तसेच त्यांच्या जेवणासाठी रात्री ७.३० वाजल्यानंतर कॅन्टीनही सुरू करण्यात आली. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.