मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारकडून आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत मंजूर केलेले १९ हजार ५३७ कोटी रूपये तात्काळ बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माहिती तंत्रज्ञान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्यासह बँकर्स समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या ऑनलाईन प्रक्रियेत एकूण ७७ लाख शेतकऱ्यांची खाती राज्य सरकारला प्राप्त झाली. पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे ६९ लाख खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली. शासनाने आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी १९ हजार ५३७ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली. यात वन टाईम सेटलमेंटसाठी ४ हजार ६७३ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. तरी हा निधी तात्काळ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बँकांनी जमा करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी देत त्यासाठी बँकांनी आपली स्थानिक यंत्रणा अधिक सक्षम करावी अशी सूचनाही केली.
त्याचबरोबर या सर्व खातेदार शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचीही व्यवस्था करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
४१ लाख खातेधारकांशिवाय आता उर्वरित खातेधारकांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी बँकांनी विशेष चमू गठीत करावेत आणि या प्रक्रियेत अधिकाधिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर फायदा मिळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करत सरकारच्या वतीने बँकासोबत समन्वयासाठी तीन चमू गठीत करण्यात आल्या आहेत. यापुढे सुद्धा असेच काम करून एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि हे काम बँकांनी पंधरा दिवसात पारदर्शकपद्धतीने पूर्ण करावे, त्यांना सहकार विभागाचे तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी मदत करतील असे सांगत शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया अशीच सुरु राहणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.