नागपूर: प्रतिनिधी
राज्यातील विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील कापसाच्या शेतीवर बोंड अळीचा रोग झाल्याने मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे कापूस शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्य सरकारला दिल्याचे माहिती राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी दिली.
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उत्पन्न झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबरच कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे उप महासंचालक डॉ.ए.के. सिंग, महिकोचे राजेश बारवाले, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. सी.डी. माईक, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ.व्ही.एन.वाघमारे आदींच्या उपस्थितीत रामगिरी येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती त्यांनी दिली.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता पुढच्या वर्षीसाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाचे उपाय यावर सुद्धा या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. यातून उद्भवलेल्या किटकनाशक फवारणीच्या समस्या, शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याची गरज यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याही व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी काही सूचना आणि मते या बैठकीत व्यक्त केली. या सर्व सूचनानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्याला सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातील एका अधिकाऱ्यांने सांगितले.