Breaking News

महाराष्ट्र बंद प्रकरणी ५ हजार दलित कार्यकर्त्यांना अटक कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी संघटनांची धावाधाव

मुंबईः प्रतिनिधी

कोरेगांव भिमा येथे उसळलेल्या दंगलीच्या निशेधार्थ दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या कालावधीत जवळपास राज्यभरातील पाच हजार दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

महाराष्ट्र बंदच्या कालावधीत काही ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळात काही ठिकाणचा अपवाद वगळता हिंसाचाराच्या घटना घडल्या. मात्र सामाजिक शांतता धोक्यात आणल्याच्या गुन्ह्याखाली बंद मध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांना जामीन करण्यापासून वकिल देण्यापर्यंतच्या गोष्टी दलित संघटनांकडून करण्यात येत असल्याचे भारिप बहुजन-महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

राज्यातील औरंगाबाद, मुंबई, कल्याण-डोंबिवली या भागातील कार्यकर्त्यांचा अटक होण्यामधील प्रमाण मोठे असल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

विशेष म्हणजे एकाबाजूला कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीतील समाजकंटकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी दलित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची तातडीने कार्यवाही सुरु केल्याने एकाच प्रकरणात दोन वेगवेगळ्या पध्दतीने निर्णय घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेविषयी शंका घेण्यात येत आहे.

Check Also

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *