मुंबई : प्रतिनिधी
सुडबुद्धीने… राजकीय द्वेष पसरवण्यासाठी… जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपाची लोकं मदरशाचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना का सुचली नाही याचं उत्तर जनतेला अपेक्षित असल्याचा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.
मदरशामधील विद्यार्थ्यांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रतिमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. ही योजना बर्याच काळापासून राज्यात सुरू आहे. भाजपचे सरकार असताना ही योजना सुरूच होती आणि आता भाजपचे लोक अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत हे कितपत योग्य असा सवालही त्यांनी यावेळी केला.
राजकीय दृष्टीकोन ठेवून ही मागणी होत आहे. त्यांच्या काळात हज का बंद केले नाही याचं आत्मचिंतन करावं आणि मग अशा प्रकारची मागणी करावी असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले.