मुंबई : प्रतिनिधी
येत्या मे महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. उपलब्ध संख्याबळानुसार कॉंग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे. मात्र कॉंग्रेसच्या वाट्याची एक जागा आणखी मागून तीन ठिकाणी उमेदवार देण्याची रणनीती राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे या तिन्ही जागा निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने काँग्रेससोबत आघाडी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नाणार प्रश्नासह, मुंबईच्या विकास आराखड्याच्या मुद्यावर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आयोजित तपत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, उस्मानाबाद-लातूर-बीड , चंद्रपूर आणि अमरावती या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मे रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या दोन दिवसात दोन्ही पक्षात चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल असे सांगतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या नेत्यांसोबत अजितदादा, धनंजय मुंडे आणि मी स्वतः चर्चा केली असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली . येत्या दोन दिवसात राष्ट्रीय पातळीवर चर्चा होवून निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक , परभणी -हिंगोली आणि रायगडची जागा आधी राष्ट्रवादीने लढवली आहे. पण सध्या लातूर मध्येही राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे हि जागा ही आम्हाला द्यावी अशी मागणी आहे. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेनेनंतर हा प्रश्न सुटेल अशी अशाही त्यांनी व्यक्त केली .
दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेने ने स्वबळावर लढण्याचा घेतलेल्या निर्णयावर शिवसेना कायम राहते का? असा प्रश्न उपस्तिथ करून त्यांनी शिवसेनेला कोपरखळी लगावली . शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. पण ते या निर्णयावर कायम राहतील असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे ही अंतिम तारीख आहे. तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे .
विधानपरिषदेत रिक्त होणाऱ्या जागा
भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)
काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)
भाजपचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे (अमरावती)
शरद पवारांच्या शिफारसीने राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी सुनिल तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी अध्यक्ष शरद पवार यांनी निवड केली असून तसे पत्र पक्षाचे जनरल सेक्रेटरी तारीक अन्वर यांनी सुनिल तटकरे आणि प्रदेश कार्यालयात पाठवले आहे. गेली ४ वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांनी पक्षवाढीसाठी आणि पक्षाची एक चांगली ओळख निर्माण केल्याबद्दल त्याची दखल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी सुनिल तटकरे यांच्या नावाची शिफारस केल्याचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी तारीक अन्वर यांनी पत्रात नमुद केले आहे.