मुंबई: प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून देशातील शेअर बाजार नवनवीन विक्रम करत आहेत. सेन्सेक्स, निफ्टीतील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मात्र, आता बाजारातील तेजीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. मागील तीन दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये तब्बल १ हजार अंकांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे कंपन्यांचे मार्केट कॅप ९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
मंगळवारपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. मंगळवारी सेन्सेक्स ६१,७१६ अंकांवर तर निफ्टी १८,४१८ वर बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स ५०० अंकांपेक्षा अधिक घसरला. यामुळे सेन्सेक्स ६१ हजारांच्या खाली पोहोचला. सेन्सेक्स ६०,६९७ च्या पातळीवर तर निफ्टी १८,२०० वर पोहोचला आहे.
मंगळवारी बाजाराचे एकूण मार्केट कॅप २७४.६९ लाख कोटी रुपये होते, तर गुरुवारी ते २६५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, तीन दिवसात त्यात ९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घट झाली. मंगळवारी आणि बुधवारी मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यामुळे बाजारावर दबाव आला.
गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या ब्लूचीप शेअर्समध्ये २ टक्के घसरण झाली. हा शेअर्स २,६३५ रुपयांवर पोहोचला. रिलायन्स मार्केट कॅप १६.८१ लाख कोटी रुपयांवर आले आहे. मंगळवारी मार्केट कॅपन १७.३१ लाख कोटी रुपये होते.. टाटा कन्सल्टन्सी (TCS) चे शेअर्स देखील २ टक्के घसरले. कंपनीचे मार्केट कॅप १३.७० लाख कोटी रुपयांवरून १३.०७ लाख कोटी रुपयांवर आले. गुरुवारी ब्लूचीप अर्थात मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम बाजारावर दिसत होता.
या वर्षी एप्रिलपासून मार्केट कॅपमध्ये ७५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. १९ एप्रिल रोजी मार्केट कॅप २०१ लाख कोटी रुपये होते. यामध्ये A ग्रुपचे मार्केट कॅप १९२ रुपये आणि B ग्रुपचे मार्केट कॅप ६.८६ लाख कोटी रुपये होते. १८ ऑक्टोबर रोजी मार्केट कॅप इंट्रा डे मध्ये २७६ लाख कोटी रुपयांवर गेले होते. यापैकी A गटाचे मार्केट कॅप २५० लाख कोटी रुपये आणि B ग्रुपचे १५ लाख कोटी रुपये होते. मार्केट कॅप मे महिन्यात २२३ लाख कोटी रुपये, जूनमध्ये २२९ लाख कोटी रुपये, जुलैमध्ये २३५ लाख कोटी रुपये, ऑगस्टमध्ये २५० लाख कोटी रुपये आणि सप्टेंबरमध्ये २६० लाख कोटी रुपये होते.