मुंबईः प्रतिनिधी
कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या मागे संभाजी भिडे यांचा हात नसून त्या मागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. तसेच १ जानेवारी रोजी भिडे हे कोरेगाव भिमा येथे नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी संबध असणे शक्यच नसल्याचा दावा शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या मुंबई विभागाचे कार्यवाह बळवंतराव दळवी यांनी केला.
दरम्यान संभाजी भिडे यांचा नियोजित कार्यक्रम पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शिव प्रतिष्ठानच्यावतीने लालबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी बोरीबंदर येथील मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरेगाव भिमा येथील हिसांचारानंतर अनिता रवींद्र साळवे यांनी अत्यंत खोटी साक्ष नोंदवून भिडे यांच्या विरूध्द खोटा गुन्हा पुणे येथे दाखल करण्यात आल्याचा आरोपही करत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये राज्यात ठिकठिकाणी मालमत्तांचे नुकसान झाले. त्या मालमत्तेच्या विध्वंसामागे कोण आहे ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
तसेच या विध्वंसाची सरकारने लवकरात लवकर चौकशी करावी आणि लोकांसमोर सत्य मांडावे. त्याचबरोबर अनिता साळवे यांच्या मागचा बोलाविता धनी कोण? असा सवाल करत त्याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर उमटलेल्या सामाजिक–राजकिय पडसादानंतरही मुंबईतील लालबाग येथील संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर टीका टीपण्णी सुरु झाली. त्यामुळे अखेर पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द केली. तत्पूर्वी मुंबई पोलिस झोनच्या उपायुक्त एन. अंबिका यांनी शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावित त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने दिलेली परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आपपाठोपाठ भीम आर्मी सामाजिक संघटनेच्यावतीने मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या मुंबईत येण्यावर बंदी घालण्याची मागणी संघटनेचे अशोक कांबळे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली. तसेच भिडे यांचा लालबाग मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रम हा आयोजकांकडून शुध्द हेतूने आयोजित केलेला नसल्याचा आरोपही भीम आर्मीने निवेदनाच्या माध्यमातून यावेळी केला.