मुंबई : प्रतिनिधी
कोकणातील नाणार प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले. तरी राज्य सरकारने नाणार प्रकल्पासाठी आखाती देशातील तीन कंपन्यांशी करार केला. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम आणि सुभाष देसाई यांनी आज झालेल्या ऐन मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांच्या या कृत्याचा निषेध केला. तसेच या प्रश्नी चर्चेची मागणी केल्याचे परिवहन मंत्री दिवकार रावते यांनी सांगितले.
नाणार प्रकल्पावरून आधीच भाजप-शिवसेनेमध्ये ताणले गेलेले संबध आणखीन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली.
केंद्र सरकारने सेनेचे नेते व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनाही या कराराच्यावेळी बोलावले का ? अशी विचारणा रावते यांना करताच रावते यांनी संताप व्यक्त करत जिथे राज्याच्या मुख्यममंत्र्यांनाच याची माहिती नाही तर मंत्र्यांना कशी मिळणार असा खोचक सवालही केला. केंद्र सरकारने कोकणातल्या जनभावानेचा आदर करून या प्रकल्पाची कार्यवाही थांबवावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेनेच्या निषेधा नंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की , परवा झालेल्या कराराची कल्पना नव्हती . मात्र याबाबत उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे रावते यांनी सांगितले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, आमच्या पोटात एक आणि ओठात एक नाही, पण असे वागणाऱ्यांचे ओठ आम्ही नीट करू असा इशाराही रावते यांनी भाजपाला दिला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, नाणारच्या मुद्यावर मंत्रिमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याने यावर बोलणे योग्य होणार नाही.