मुंबई : प्रतिनिधी
आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पुर्तता केली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिली. तसेच पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले.
कृषी व फलोत्पादन आणि कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामासंदर्भात आज आढावा बैठक झाली. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
पीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपलं सरकार’ केंद्रामार्फत, किंवा कर्ज घेतलेल्या बँकांमार्फत २४ जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचा अजूक अंदाज व जमिनीचा ओलावा विचारात घेऊनच पेरणीची प्रक्रिया सुरु करावी. तसेच, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अंतरपिके घेण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय, खते आणि किटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.