मुंबई : प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला राजकिय पाठबळ देण्यासाठी भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुढाकार घेत तीचे वक्तव्य स्वत:च्या ट्विटवर रिट्विट करत समर्थन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोशल मिडियामध्ये त्यांच्या या कृत्याची यथेच्छ धुलाई झाल्यानंतर आणि सत्ताधाऱ्यांनी टीकेचा भडिमार केल्यानंतर अखेर त्या चुकीची सारवासारव करण्यासाठी भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुढाकार घेत कंगनाच्या वक्तव्याचे भाजपा समर्थन करत नसल्याच सांगत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सुशांतसिंगच्या मृत्यूच्या चौकशीतून बाहेर येणाऱ्या माहितीवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करु नये. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून बाहेर येणाऱ्या माहितीवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी खा. संजय राऊत यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठीच त्यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या वक्तव्याचा आधार घेतला आहे. कंगना ने मुंबईकर, महाराष्ट्र याबाबत केलेल्या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. कंगनाने मुंबईकरांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नये. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणावरून शांतता, सद्भाव याला तडा जाईल अशी वक्तव्ये करणे सर्वांनीच टाळावे असे आवाहनही केले.
शेलार यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.