मुंबई: प्रतिनिधी
सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या ट्वीटमधून तिने आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठीच होते, असा कबुलीजबाब दिलेला आहे. “सच मे भाजपा को खुश करके” या तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भारतीय जनता पक्षानेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती. भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच ती महाराष्ट्राची बदनामी करत होती, यावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
सुशांत सिंग प्रकरणात कंगनाने घेतलेली भूमिका व बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांबद्दल तिच्याकडे खूप माहिती आहे असा तिने आणलेला आव हा भाजपच्या इशा-यावरच होता. अद्यापही तिने एनसीबीला कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु जनतेच्या पैशातून भाजपने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी तर कंगनाला झाशीची राणी म्हटले यावरून तिला भाजपचे राजकीय संरक्षण देखील प्राप्त होते. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केली. मुंबई पोलिसांना माफिया म्हटले. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत असे म्हटले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला. कंगना दररोज महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते खुश होत होते. यातूनच त्यांचा महाराष्ट्र द्रोह स्पष्ट होतो. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या या कुटील कारस्थानाचा तीव्र निषेध करत असून राज्यातील जनता भाजपच्या या महाराष्ट्र द्रोहाला कदापी माफ करणार नसल्याचे ते म्हणाले.
Tags bjp congress kangana ranaut ram kadam sachin sawant
Check Also
नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली
जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …