मुंबई: प्रतिनिधी
राज्याला लस जास्त कशी मिळेल असा प्रयत्न करा… तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय… अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण वेगवेगळ्या ठिकाणी थांबलं आहे ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली अशी विचारणा करत महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयात लसीचा पुरवठा पुरेसा आहे तिथे लसीकरण सुरू आहे. दुर्दैवाने राज्यात लसीची कमतरता पडायला लागली आहे. सगळ्या जिल्ह्यातून ही ओरड सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांना हे माहित असेल तर कोणत्या जिल्हयात लसीची जास्त उपलब्धता आहे तर त्या जिल्हयाचं आणि तालुक्याचे नाव सांगावं आम्ही त्याठिकाणी लसीकरणाचा काय दर आहे, किती वेगाने सुरू आहे हे लगेचच सांगू शकतो. शेवटी राज्यातील जनतेला म्हणजे आमचंच राज्य आणि आमच्याच जनतेला घाबरवू हा कुठला प्रकार आहे असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लसीकरण केले जात आहे. महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करु शकत नाही. आम्हाला लस कमी पडतेय म्हणून तर मागणी करतोय. फडणवीसांनी दिल्लीची बाजु घेऊन बोलणं आवश्यक नाही किंवा ते अभिप्रेत नाही. त्यांनी महाराष्ट्राच्यावतीने लसीचा पुरवठा केंद्राने लवकर करावा अशी मागणी केली असती तर मला आनंद झाला असता असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.