मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यानी केल्याचे वृत्त एका वृतपत्रात प्रसिध्द झाले. मात्र ते वाक्य माझ्या तोंडी चुकीचे पध्दतीने टाकल्याचा खुलासा एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी त्या द्रोह करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा अन्यथा धरणे आंदोलन करू असा इशारा गृहमंत्र्याना दिला. त्यामुळे पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांवर राजकारण तापणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गृहमंत्री देशमुख आणि केलेला खुलासा आणि प्रकाश आंबेडकरांनी दिलेला इशारा दोन्ही वाचा
पोलीस अधिकाऱ्यांबाबत माझ्या तोंडी चुकीचे वक्तव्य घातले
अनिल देशमुख यांचा खुलासा
राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले आहेत, असे मी म्हटल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे. मात्र, अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पध्दतीने टाकले असल्याचा खुलासा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघात अनौपचारिक भेट देशमुख यांनी दिली. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा इन्कार करताना देशमुख म्हणाले, एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे. मी असं कुठेही म्हटलेलो नाही. या मुलाखतीचा व्हिडीओ यूट्युबवर उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला तर वस्तुस्थिती लक्षात येईल.
द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांना अटक करा, अन्यथा धरणे आंदोलन करू – प्रकाश आंबेडकर
सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एन आय ए अंतर्गत अटक झाली पाहीजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
एका वेबसाईडला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का एन आय ए अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. या द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही शेवटी ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.