मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मेक इन महाराष्ट्रनंतर पुन्हा एकदा मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा कार्यक्रम १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात नरीमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे कर्टन रेजरचा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमास राज्य सरकारमधील मंत्री, शासकिय अधिकाऱ्यांबरोबरच, सीआयआय या उद्योग संस्थेचे पदाधिकारी, केंद्र सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मेक इन इंडिया कार्यक्रमाला गती मिळणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या कार्यक्रमात २० हजार ९८४ कंपन्यांसोबत सामंज्यस करार झाले. तर एकूण गुंतवणूकीपैकी ६१ टक्के प्रत्यक्ष गुंतवणूक झाली असून २२ लाख रोजगारापैकी ७४ टक्के नागरीकांना रोजगार मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.
तर राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई बोलताना म्हणाले की, गुंतवणूकदारांची पसंती आजही महाराष्ट्राला असून भविष्यासाठी सज्ज असलेले राज्य ठरणार आहे. तसेच या मॅग्नेटीक महाराष्ट्रचा फायदा नक्कीच होणार असल्याची आशाही व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅग्नेटीक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ही स्पर्धा घेण्यात येणार असून यातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.
२०१६ साली मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर मेक इन इंडिया कार्यक्रमातंर्गत मेक इन महाराष्ट्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण देशभरात ८ लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे सामंज्यस करार करण्यात आले होते. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात २ लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक होणार असल्याची आकडेवारी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली. मात्र त्याबाबतचे सांमज्यस करार होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यातील म्हणावी इतकी गुतंवणूक राज्यात प्रत्यक्षात झालेली नाही.