अहमदनगर : प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीत साखर कारखानदारी ही तोट्यातील असून आपल्याकडे साखरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच साखरेचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नव्या साखर कारखानदारींना बंदी घालायला पाहिजे अशी सूचना केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केली.
अहमदनगर महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अ.नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार रोहित पवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ब्राझीलमधील विमानांपासून सर्व गाड्या मर्सिडेज बेंज, फोर्ड, ह्युंडाई पासून सर्वच वाहने ही इथेनॉलवर चालत आहेत. त्याधर्तीवर आपल्याकडेही इथेनॉलवर आधारीत वाहनांची निर्मिती आणि वापर सुरु झाला पाहिजे. साखर कारखान्यांनी साखर निर्मिती करण्याऐवजी इथेनॉलची निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे. ८०० मिलीलिटर पेट्रोलच्या किंमतीत एक लिटर इथेनॉल निर्मित होते. तसेच पेट्रोलच्या किंमतीपेक्षा इथेनॉल २५ टक्के कमी किंमतीत उपलब्ध होते. तसेच केंद्र सरकारने नवे धोरण निश्चित केले असून साखर कारखान्यांनी निर्माण केलेले इथेनॉल केंद्राकडून खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना त्याचे पैसेही मिळतील आणि शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसेही जातील असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्यासाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे या आगामी काळात भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम आणि इडियन ऑईल पेट्रोलियम पंपाच्या धर्तीवर सर्वत्र इथेनॉलचे पंप दिसायला लागतील. त्यातील पहिले ३ पंपांचे पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याचेही सांगत प्रत्येक साखर कारखान्यांना आपले इथेनॉलचे पंपाचे वाटप करता येणार असल्याचे सांगत यासंदर्भात भारत सरकारकडून लागणाऱ्या ज्या काही परवानग्या लागतील त्या मी घेवून देतो अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या पध्दतीचा प्रयोग मी माझ्या साखर कारखान्यात केला असून तशा गाड्यांची निर्मितीही केल्याचे आवर्जून सांगितले.
नवे तीन महामार्ग प्रकल्पाची घोषणा
सूरत-अहमदनगर- नाशिक-सोलापूर मार्गे चेन्नई अशा एका नव्या ग्रीनफील्ड रस्ते महामार्गाची घोषणा करत पुढे या रस्त्याला दक्षिणेतील सर्व राज्ये जोडली जाणार असल्याची घोषणा गडकरी यांनी करत दुसरा एक रस्ता कोल्हापूर मार्गे दक्षिणेत जाणारा करण्यात येणार आहे. याशिवाय अहमदनगर बीड दरम्यानही नवा रस्ता उभारण्यात येणार आहे. तसेच अहमदनगरमध्ये रिंगरूट रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठीही राष्ट्रीय हायवे अॅथोरीटीकडून पैसे देण्यात येणार आहे. याशिवाय लातूरमध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे नवा पूल बांधण्यात आलेला असून त्याचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई दिल्ली महामार्गाला मुंबईतील नरिमन पॉईंटला जोडण्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दूध उत्पाकता वाढविण्यासाठी केंद्राकडून नव्या वीर्याचा पुरवठा
राज्यातील गायींची दूध उत्पादकता वाढविण्यासाठी परदेशातील उच्च दर्जाच्या सांडाचे वीर्य केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील २०० गायींची निवड करण्यात येणार आहे. या २०० गायींना ते वीर्य पुरविण्यात आल्यानंतर गायी या २ लिटर वरून २५ लिटर दूध द्यायला लागतील असे सांगत यासंदर्भात आपण राज्याचे पदुम मंत्री सुनिल केदार यांच्याशी बोलल्याचे त्यांनी सांगितले.
जॉन एफ केनेडी याच्या त्या वाक्यानुसार काम करायला सुरुवात
मी महाराष्ट्रात मंत्री असताना माझे एक सचिव होते तांबे त्यांनी मला एकदा जॉन एफ.केनेडी यांचे वाक्य ऐकविले ते वाक्य होते, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले आहेत असे नव्हे तर रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. त्यानुसार भारताचाही विकास करायचा असल्याने आणि येथील प्रत्येकाला रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी चांगल्या रस्त्यांची निर्मिती करण्यासाठीचे काम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.