Breaking News

हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट सुरु करायचाय थांबा परवानग्यांची संख्या कमी होणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : प्रतिनिधी

हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत या क्षेत्राकरिता लागणाऱ्या विविध परवानग्यांची संख्या कमी करणे तसेच या प्रक्रियेचे सुलभीकरण करण्याच्या अनुषंगाने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, कामगार विभागाच्या सचिव विनीता सिंगल, उर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक दिलीप गावडे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांच्यासह मुंबई महापालिका आदी संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह यांनी सादरीकरण केले. आदरातिथ्य क्षेत्राला कोणकोणत्या विभागाच्या परवानग्या लागतात, त्यातील कोणत्या आवश्यक नसलेल्या परवानग्यांची संख्या कमी करता येईल याबाबत माहिती दिली.

कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राला निश्चितच चांगले दिवस येतील. याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग विविध निर्णय घेत आहे. कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरणही तयार होत आहे. खासगी- सार्वजनिक सहभागातून काही प्रमुख पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात हॉटेल ताज गुंतवणूक करीत आहे. आदरातिथ्य क्षेत्रात रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे, त्यामुळे राज्यात भविष्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल, रिसॉर्टस्, होम स्टे, फार्म स्टे आदी निर्माण होतील यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करीत आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी अर्ज, परवानग्यांची संख्या कमी करणे तसेच ही प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे असून यासाठी सर्व संबंधीत विभागांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

आदरातिथ्य क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच छताखाली मिळतील यादृष्टीने वेबपोर्टल तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

Check Also

व्होडाफोन आयडियाचा एफपीओ १८ एप्रिलला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी, सरकार फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) द्वारे व्होडाफोन आयडियाच्या निधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *