मुंबई: प्रतिनिधी
राज्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रात येणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, लॉज सुरु करण्यास लागणाऱ्या परवानग्यांच्यादृष्टीने क्रांतिकारी निर्णय पर्यटन विभागाने घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी ७० परवानग्यांऐवजी आता १० परवानग्या तसेच ९ स्वयं प्रमाणपत्रे लागतील. यासंदर्भात साधारत: दोन आठवड्यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केली होती. त्यानंतर यावर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
परवानग्या, परवाने यांच्या संख्या लक्षणीयरीत्या कमी केल्यामुळे व्यवसाय सुलभता येऊन या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर गती मिळेल तसेच गुंतवणूक आकर्षित होऊन रोजगारही वाढणार आहे. व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्रासाठी फक्त १० परवानग्या/परवाने/ना-हरकत प्रमाणपत्रे आणि ९ स्वयं प्रमाणपत्रे लागू करण्यात येतील.
जेथे कायद्याने कालमर्यादा निश्चित केलेली नाही अशा सर्व परवानग्या/परवाने/ना-हरकत प्रमाणपत्रांचा वैधता कालावधी निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाचा राहील. या सेवा “महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम 2015” च्या कक्षेत आणण्यात येतील.
आदरातिथ्य क्षेत्रासाठी अधिक व्यवसाय सुलभता निर्माण होण्याकरीता “एक खिडकी योजना” अंतर्गत एकाच ऑनलाईन अर्जाव्दारे परवानग्या देण्याबाबतची कार्यवाही पर्यटन विभागामार्फत करण्यात येईल.