मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच काही ठिकाणी तर काळजी घेण्याइतपत संख्या वाढत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे आखलेल्या नियमांची आणि लसीकरणाची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले.
केंद्राने आज राज्यांची आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत देशातील कोरोना संसर्गाची स्थिती, लसीकरण याचा आढावा घेण्यात आला. यामंध्ये राज्यातील आरोग्यमंत्री, सचिव सहभागी झाले होते. कोरोना संपलेला नाही, तेव्हा कोरोनाबाबत आखलेल्या नियमांची आणि लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.
कोरोना बाधित रुग्णाशी संपर्कात आलेल्यांचा शोध आणि कोरोना विषाणूच्या जनुकीय क्रमानिर्धारणाकडेही लक्ष ठेवावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.
विशेषतः काही राज्यांत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याबद्द्ल आवश्यक पावले उचलण्याच्या सुचना यावेळी मनसुख मांडवीय यांनी केल्या. यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकताही व्यक्त केली.
निर्बंध जरी हटवण्यात आले असले तरी जे कोरोनाबाबतचे नियम लागू आहेत त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यात यावे. विशेषतः परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या, आरोग्य सुविधा, लसीकरण याकडे लक्ष द्या अशी सूचनाही त्यांनी केली.
हर घर दस्तक मोहिम, १२ ते १७ वयोगटाचे लसीकरण, १८ ते ५९ वयोगटासाठी वर्धक लस, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण यावर भर द्यावा अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना या बैठकीच्या माध्यमातून केल्या. तसंच कोरोनाच्या लसी या वाया जाणार नाही याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
Union Minister @mansukhmandviya interacts with State Health Ministers; reviews status & progress under “HarGharDastak 2.0”
Minister urges States to focus on increasing #COVID vaccination coverage of school going children & Precaution Dose for the elderlyhttps://t.co/QKtswGjiZb pic.twitter.com/q8YmPuY7Nm
— PIB India (@PIB_India) June 13, 2022