मराठी ई-बातम्या टीम
डिसेंबर महिना अखेरपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यासंदर्भात आज केंद्र सरकराकडून यासंदर्भातील माहिती प्रसारीत करण्यात आली असून देशातील आर व्हॅल्यू जे संक्रमणाचा प्रसार दर्शविते ते करोनाची दुसरी लाट पीकवर असताना १.६९ होते, ते आता २.६७ वर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत करोनाची रुग्णसंख्या खूप जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, शहरांमध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे आणि ओमायक्रॉन या प्रकारामुळे ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळायलाच हवी,असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण आता करोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढीचा सामना करत आहोत आणि ही वाढ ओमायक्रॉनमुळे नोंदवण्यात येत आहे, असा आमचा विश्वास आहे. ही वाढ विशेषतः आपल्या देशाच्या पश्चिम भागात आणि मोठ्या शहरांमध्ये अधिक असल्याचं आमच्या जवळ उपलब्ध असलेल्या डेटामधून समोर आल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही.के. पॉल यांनी दिली.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस केस पॉझिटिव्ह रेट १.१ टक्के होता आणि दुसर्या दिवशी तो १.३ टक्के होता आणि आता देशात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला जात आहे. त्याचप्रमाणे ३० डिसेंबरला कोरोना बाधितांची संख्या १३ हजार होती, ती मंगळवारी म्हणजेच ४ जानेवारीला ५८ हजारांवर पोहोचली.
स्पष्टपणे सांगायचे तर ही वेगाने पसरणारी महामारी आहे. आर नॉट व्हॅल्यू २.६९ आहे. कोरोनाची दुसरी लाट पीकवर असताना हे केवळ १.६९ होती, त्यामुळे तुलनेने ही संख्या खूप जास्त आहे. यावेळी कोरोना रुग्णांच्या संक्रमित होण्याचा वेग जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण कमी आहे, ही काहीशी दिलासादायक बाब आहे. सध्या दिल्लीत रुग्ण भरती होण्याचं प्रमाण हे ३.७ टक्के आणि मुंबईत ५ टक्के आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार २०२० आणि २०२१ मध्ये कोरोना लाटेच्या सुरुवातीच्या काळात हे प्रमाण २० टक्क्यांच्या जवळपास होते असेही त्यांनी सांगितले.