मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रूग्णसंख्येत चांगलीच घट आली आहे. तसेच मृतकांच्या संख्याही नियंत्रित राहीलेली आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आता राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. पण तिसरी लाट संपली हे माझं वैयक्तिक असल्याचा खुलासा करायला विसरले नाहीत. त्याचबरोबर मास्कमुक्तीबाबत घाई गडबडीत चालणार नसल्याचे मत व्यक्त केले.
सध्या राज्यात ९ हजार सक्रिय करोना रुग्ण असून आहेत. तिसऱ्या लाटेतील करोना बाधितांची दररोजची संख्या ही ४८ हजारापर्यंत गेली होती. परंतु आता राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नसल्याचे ते म्हणाले.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परिणाम भोगले, त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे अशी भूमिका घेऊन चालणार नाही. सध्या आपण निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करत आहोत. मात्र, मास्कमुक्तीचा निर्णय घेताना घाईगडबड चालणार नाही. हा निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले.
टोपे यांच्या हस्ते आज जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील नागरीकांना सरसकट बूस्टर डोस देण्यात यावा, अशी कोणतीही मागणी राज्याच्या टास्क फोर्सने केलेली नाही. बूस्टर डोस नागरीकांना देण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्या प्रमाणे नागरीकांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत कोरोनावरील दीड लाख डोसची एक्सपायरी डेट जवळ आल्याने आरोग्य विभागासमोर हा चिंतेचा विषय नक्कीच आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर त्या बाबतचा निर्णय घेतला जाईल. जालन्यातील पल्स पोलिओ लसीकरण कार्याक्रमाला यायला ईतर कार्यक्रमामुळे उशीर झाला असला तरी लसीकरण सकाळीच सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या असा खुलासाही त्यांनी यावेळी दिला.
पल्स पोलिओच्या शुमारंभ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात करण्यात येणार होता. परंतु मंत्री टोपे हे वेळेवर पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत पोलिओ लसीकरणास सुरुवात करण्यात आल्याने याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क वर्तविण्यात येत होते.