राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर लगेच राज्याच्या आरोग्य विभागाने एक परिपत्रक काढत बंदिस्त असलेल्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे त्यात नमूद केले. यावरून संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना यावर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे.
या संभ्रमावस्थेवरून आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पुण्यात आले असता काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठून विचारले असता ते म्हणाले, की परिपत्रकामधील मस्ट याचा अर्थ प्रसारमाध्यमांनी अपील या अर्थाने घ्यावा आणि त्याचपध्दतीने बातम्या द्याव्यात असा खुलासा केला.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मास्क बाबत निर्णय सध्या लगेच होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेतली आहे. त्यानुसार आणखी १५ दिवसानंतर मास्कबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत आढावा बैठक घेतली. निर्बंध टाळायचे असतील तर मास्क वापरा, शिस्त पाळा आणि लसीकरण करून घ्या असे आवाहन केले. त्याचबरोबर पुढील दोन आठवडे राज्य सरकार कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवणार आहे. त्यानंतर मास्कबाबतचा निर्णय घेणार असल्याचा इशारा दिला.
तर दुसऱ्याबाजूला मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही मुंबईत पुन्हा टेस्टींग आणि ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून रोजच्या रोज होणाऱ्या चाचण्यांची माहितीही महापालिका पाठवून देण्याचे आवाहनही खाजगी लॅब चालकांना दिले. याशिवाय पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर अद्यावयत करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जानेवारी महिन्यापासून एप्रिल महिना अखेरपर्यत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत होते. मात्र मे महिन्यापासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही वाढ मुंबईसह ९ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.