मुंबई : प्रतिनिधी
एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर ‘इकबाल’ बनत हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत भारतीय प्रेक्षकांवर मोहिनी घालणारा अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्याकडे वळला आहे. ‘बाजी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केल्यानंतर श्रेयस ‘गुलमोहर’ या नव्या मालिकेसह छोट्या पडद्याकडे वळला आहे. या मालिकेत तो नात्यांची कथा तर सांगणार आहेच, पण त्यासोबतच रसिकांच्या चेहऱ्यावर हास्यही फुलवणार आहे.
कोणतही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं असो, आई मुलाचं किंवा नवरा बायकोचं. नातेसंबंध आणि त्यात असणारं प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणावं या उद्देशाने झी युवावर २२ जानेवारीपासून ‘गुलमोहर’ ही प्रेम, भावना आणि नातेसंबंध यांवर आधारित विविध कथा सांगणारी नवीन मालिका सुरु होत आहे. या मालिकेच्या माध्यमातून मराठीतील बरेच मोठे कलाकार प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत.
पहिली गोष्ट ही आयुष्यात हसणं कसं आणि किती महत्वाचं असतं याचा प्रत्यय देईल. या मालिकेतील पहिल्या गोष्टीत श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री गिरीजा गोडबोले ही जोडी पाहायला मिळेल. मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेललाइफ अशा आजच्या तरूणाईच्या भावविश्वाचे आकाशच जणू झी युवा या चॅनेलने आपल्या कवेत घेतले असून ‘गुलमोहर’ ही मालिका म्हणजे या वाटचालीतील नवं पाऊल असल्याचं मत श्रेयसने व्यक्त केलं आहे. त्यामुळेच या मालिकेतील पहिल्या गोष्टीबद्दल विचारण्यात आले तेव्हा लगेच तयार झाल्याचंही श्रेयस म्हणाला. मंदार देवस्थळी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.