Breaking News

राज्यपालांनी राज्य सरकारला आदेश दिल्यानंतर फडणवीसांची मागणी अन्यथा मागास भागांची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येण्याची विरोधी पक्षनेत्यांना भीती

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील वैधानिक विकास मंडळांचा कालावधी आज ३० एप्रिल रोजी संपत असून, ही मुदतवाढ न देण्यात आल्यास मागास भागांची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येईल. त्यामुळे या वैधानिक महामंडळांवरील नियुक्त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यासंदर्भात राज्य सरकारला आदेश देत वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देण्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. त्यानंतर यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली.
वैधानिक विकास मंडळांची मुदत आज संपत आहे. सत्तेतील एक पक्षाने सातत्याने याचा विरोध केला. परंतू त्यांच्या दबावात येऊन वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ न दिल्यास मागास भागाची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येईल. विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील मागास भाग यामुळे विकासापासून वंचित राहील अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वैद्यकीय योगदानास तयार
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या संवादसेतूच्या सत्रात माजी सैनिकांशी संवाद साधला. या संवादात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे सुद्धा उपस्थित होते.
या माजी सैनिकांनी देशाच्या सेवेसाठी आपल्या आयुष्यातील मौल्यवान काळ दिला आहे आणि आज कोरोनाविरोधातील युद्धात सुद्धा ते त्याच ताकदीने उतरले आहेत, याचा मला अतिशय आनंद होतो. आपण सर्वांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, कोरोनाविरोधातील हे युद्ध काही अजून संपलेले नाही. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर आपल्या सर्वांना अधिक सावध राहून काम करावे लागेल. अधिक ताकदीने आणि शिस्तीने या स्थितीचा मुकाबला करावा लागेल. थोडक्यात काय तर कोरोनासोबतच जीवन जगणे शिकावे लागेल. अधिक संघटितपणे या काळात काम करण्याची सर्व माजी सैनिकांची इच्छा आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. ज्यांनी लष्कराच्या रूग्णालयात काम केले आहे, त्यांना या काळात वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा आहे, ही सुद्धा अतिशय आनंदाची बाब आहे. लॉकडाऊनची अधिक प्रभावीपणे आणि शिस्तीत अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा ते मोलाची कामगिरी वठवू शकतात. त्यांच्या शिस्तीचे आणि ज्ञानाचे भाजपाच्या सेवाकार्यात मोठे योगदान मिळतेय, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा हल्लाबोल; वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *