मुंबईः प्रतिनिधी
केंद्रातील विद्यमान मोदी सरकारने महात्मा गांधी यांच्या ‘राष्ट्रनिर्मितीसाठी खादी’ या मंत्राला ‘राष्ट्र परिवर्तनासाठी खादी’ असा मंत्र देऊन खादीला जगातील ६० देशांपर्यंत पोहचविली असून लवकरच खादी १५० देशांपर्यंत पोहचविणार असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी मुबईत मंगळवारी केले.
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून खादी उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी भरविण्यात आलेल्या ‘खादी फेस्ट २०१८’ प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी सिंह यांच्या हस्ते झाले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून (केव्हीआयसी) ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विले पार्ले (प.)येथे आयोजित हे प्रदर्शन १ नोव्हेंबपर्यंत सुरू राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच ‘खादीचा वापर करा’ असे आवाहन केले आहे. संपूर्ण देशामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे खादी व्यवसायात वाढ झालेली आहे. गावांमध्ये खादी आणि गाय याचा चांगला उपयोग रोजगार निर्मितीसाठी होतो. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. भारताबाहेरील देशांमध्ये खादीसंबंधित बाजारपेठेला काबीज करण्यासाठी जगभर प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. त्यामुळे सुद्धा खादीची मागणी वाढणार असल्याचे मत सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले.
यावेळी सिंह यांच्या सोबत केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना आणि केव्हीआयसीच्या मुख्याधिकारी प्रीता वर्मा उपस्थित होत्या. या महोत्सवात विविध राज्यांतील कुटिरोद्योगांतून निर्मित खादीचे कपडे, खादी सिल्कच्या साडय़ा, ड्रेस मटेरिअल, कुर्ते, जॅकेट्स, बेडशीट्स, कार्पेट्स यांबरोबरच रसायनमुक्त शाम्पू, मध व इतर घरगुती वस्तू आणि कला व कारागिरीच्या वस्तू उपलब्ध आहेत. थेट जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशभरात कार्यरत असलेल्या सुमारे १०० संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.
Tags khadi exhibition minister of state giriraj singh
Check Also
एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे
इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …