मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा दिला. मात्र सातत्याने राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रित राहिल्याने अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे राज्यभर मुलांना पुन्हा शाळेत जायला कधी मिळणार? याप्रश्नावर आता पडदा पडला असून यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज घोषणा केली.
राज्यातील ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार असून यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने ७ जुलै २०२१ रोजी जीआर काढला होता. त्या शासन निर्णयानुसार ज्या ग्रामीण भागात कोविडमुक्त झाला आहे, तिथे ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून त्या शाळांना परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार एसओपीही दिल्या होत्या. नंतर ग्रामीण भागात ५वी ते ८वी आणि शहरी भागात ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १० ऑगस्ट रोजी त्याच्या एसओपी देखील जाहीर केल्या होत्या. त्यानंतर यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या एसओपींमध्ये अजून काही सूचनांचा समावेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा निर्णय निवासी शाळांना लागू असणार नसून, नियमित भरणाऱ्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असेल, असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विद्यार्थी आणि पालकांसाठी काय आहेत नियम :
शिक्षकांचं लसीकरण, शाळांमध्ये हेल्थ ट्रेनिंग, शाळेत येताना घ्यायची काळजी, खेळाबद्दलचे नियम, आजारी विद्यार्थ्यांना शोधायचं कसं, याविषयीचे नियम ठरवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना अवगत करून देणं आणि त्यांच्याशी कसं वागावं हे शिक्षकांना सांगावं. शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा व्हायला हवी. तसेच, घरात जाताना मुलांनी काय काळजी घ्यायला हवी, गणवेश धुवायला टाकणे, लागलीच आंघोळ करणे.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणं, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळेनं सक्ती न करणं, विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक अंतर ठेवणं, शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा ठेवणं.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस व्हायला हवेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जावी.
विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळला, तर अशा मुलांसाठी आयसोलेशन सेंटर करावं. स्थानिक डॉक्टरांचे क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. शाळांनी अशा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी.
विद्यार्थ्यांचं तापमान वारंवार चेक करत राहावं. ज्या विद्यार्थ्यांचे पालक डॉक्टर आहेत, अशा पालकांनी शाळांमध्ये स्वत:हून सहभागी होऊन या संदर्भात मदतीचा हात पुढे करावा.