मुंबई: प्रतिनिधी
केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्राताई वाघ आणि इतरही सहकारी उपस्थित होते.
ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.