Breaking News

कोरोना: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात संचारबंदीसह हे निर्बंध जारी राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी आदेश

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात कोरोनाविषयक जिल्हा प्रशासनाचे निर्देश जारी

यवतमाळ जिह्यात उद्यापासून दुकाने सकाळ ८ ते रात्री ८ पर्यंत चालू राहणार. दुकानात पाच जणांच्या वर एकत्र जमण्यास बंदी. हॉटेल रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू राहणार. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वाशीम जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. मास्कचा वापर न केल्यास दुकानदारासह ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजी बाजाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.

 बुलढाणा जिल्ह्यात आठवडी बाजार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार. शाळा, महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत बंद. दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

अकोला – संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असणार आहे. येत्या काळात रात्री संपूर्ण संचारबंदी लागू असेल.

अमरावती जिल्ह्यात दर आठवड्यात शनिवार सायंकाळपासून ते सोमवार सकाळपर्यंत बाजारपेठा व सर्व व्यवहार बंद राहतील. आस्थापना, दुकाने रात्री आठला बंद होणार. जलतरण तलाव, इनडोअर गेम बंद. धार्मिक समारंभाला मर्यादा (केवळ पाच उपस्थितांना परवानगी).

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवारी संपूर्ण तर रात्रीही संचारबंदी-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपुर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

गरज वाटेल त्या ठिकाणी सक्तीने कारवाई करा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, लसीकरण पूर्ण क्षमतेने करणे आणि सोबतच कोणत्याच परिस्थितीत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे या सर्व आघाड्यांवर  एकाच वेळी प्रशासनाला काम करायचे असून  यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर सामंजस्याने व सहकार्याने  पूर्ण गतीने कार्यरत व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी  प्रशासनासह नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्या खासगी रुग्णालयात सिटीस्कॅन केले जाते, तेथे रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास त्याबाबत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय- नियंत्रण कक्ष येथे त्या रुग्णाची माहिती त्वरित द्यावी. तसेच संबंधित रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास सूचना द्याव्यात.  यात दिरंगाई करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

काटेकोर अंमलबजावणी करावी   – विभागीय आयुक्त

 नागपूर  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या संदर्भातील स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोना विषयक जिल्हा प्रशासनाचे निर्देश

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश काढले आहेत.यामध्ये हॉल,लॉन्स, मंगल कार्यालय तसेच इतर अन्य ठिकाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करतांना उपस्थितांच्यामर्यादेचे बंधन घातले आहे. तसेच समारंभाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षिततेच्या नियमांचे काटकोर पालन करणे आवश्यक आहे. पोलीस, प्रशासकीय प्रमुखांनी केलेल्या कार्यवाईचा अहवाल तत्काळ आपत्कालीन कक्षास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात  कोविड केअर सेंटरची  तपासणी  व आवश्यक साहित्याची  स्थिती तपासणीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. लग्न संमारभाच्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून येणार नाही याची दक्षता घेणे. तसेच शाळा, महाविद्यालय, सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कोरोनाच्या नियमांचे पालन करता आहेत की नाही याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

  धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांना २०० रुपये दंड,डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहे.

तसेच खासगी डॉक्टरांकडून नियमितपणे घेणार आढावा घेण्यात यावा. गृह विलगीकरण, अलगीकरणातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार .बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० व्यक्तींची चाचणी करावी. विवाह सोहळ्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असून सर्व हॉटेल सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंतच राहणार सुरू राहणार.दुकानात एकावेळी मिळणार पाच ग्राहकांनाच प्रवेश, प्रवासी वाहनांतील संख्येवर निर्बंध तसेच सार्वजनिक उद्याने पहाटे ५ सकाळी ते ९ पर्यंतच खुली राहणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका आदेशान्वये जाहिर केले आहे.

 जळगांव जिल्ह्यात लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाई होणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. रुग्णसंख्या वाढल्यास शाळांबाबतही निर्णय घेण्यात येईल असेही राऊत यांनी सांगितले आहे.

 नंदुरबार जिल्ह्यात उपहार गृहे,हॉटेल, रेस्टाँरंट व तत्सम ठिकाणे इत्यादी ठिकाणी ५० टक्के क्षमतेसह सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहतील. खाजगी कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रे येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दकण्यात आले आहे. भाजी मार्केट, शॉपिंग कॉम्लेक्स, मॉल या ठिकाणी एकावेळी केवळ ५ ग्राहक उपस्थित राहतील. याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार– गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

सातारा : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी   प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

रस्त्यावंर विनामास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करुन  गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी २० जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. भाजी विक्रेते, दुकानदार, रेस्टॉरंटवाले यांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी गर्दी टाळावी, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टनसिंग ठेवा, सण- समारंभ कमीत कमी संख्येत साजरे करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

औरंगाबाद विभागात निर्बंध आदेश जारी

लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपययोजना अंमलात आणण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून बैठका घेण्यात आल्या.

लातूर जिल्ह्यात कोविड सदृश्य रुग्णांची कोविड-19 निदान चाचणी होणे आवश्यक असून त्यासाठी लातूर जिल्हयातील शासकीय / खाजगी दवाखान्यात येणाऱ्या अशा रुग्णांची कोविड-19 निदान चाचणी करुन घ्यावी व चाचणीत रुग्ण्‍ पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्वरित उपचार करावेत. जिल्हयातील मंगल कार्यालये आणि कोचिंग क्लासेस यांनी कोव्हिड च्या निर्देशांचे पालन करावे असे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सूचित केले आहे.

औरंगाबाद जिल्हात कोवीड- १९ च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांची यशस्वी  अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी यांची निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897  कायदा अंतर्गत  जिल्ह्यात शासनाच्या  मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे.

 परभणी जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७.०० वाजेपासून ते २८ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या १२.०० वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.

 जालना जिल्हात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 15 फेब्रुवारीपासुन ते दि.16 मार्च  2021 चे रात्री 12 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात विविध संघटना, व्यक्ती यांना निवेदन सादर करतांना 5 व्यक्ती पेक्षा अधिक असणार नाही व उपोषण, मोर्चे, निदर्शने या करीता परवानगी देण्यात येणार  नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी फौजदारी  प्रक्रिया संहिता 144 चे प्रतिबंधात्मक आदेश लागु  केले आहे.

बीड जिल्हात कोविड विषयक नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसवर योग्य ती कायदेशीर कार्यवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.

उस्मानाबाद : विनामास्क आढळून आल्यास प्रथम 500 रुपयांचा दंड करण्यात येईल. पुन्हा तीच व्यक्ती आढळल्यास 1000 रुपये दंड व आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार कारवाई करण्यात येईल असे  उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.

 नांदेड: जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासाने पुढे सरसावणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाब असून आरोग्य विभागानेही कोरोना तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, आरोग्य विभागाची यंत्रणा आणि प्रशासनातर्फे केले जाणारे नियोजन याची आढावा बैठक डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड : 18 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 30 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  35  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *