Breaking News

चालकांनो सावधान आता आरटीओच्या ताफ्यात ही आलीत वाहने मोटार वाहन विभागाच्या वायुवेग पथकात ७६ नवीन इंटरसेप्टर वाहने दाखल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा ७६ वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमारडीए मैदान, वांद्रे कुर्ला संकुल येथे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वाहनांची पाहणीही केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले त्याप्रमाणे रस्त्यांवरील वेगवान धावणा-या वाहनांच्या अपघातात बळी जाणा-यांची संख्या हजारात आहे. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत असे आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. यावर आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज वाहने दाखल झाली असून यामाध्यमातून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल स्थानी असल्याचा अभिमान आहे.

परिवहन विभागाने अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचे समाधान व्यक्त करून या यंत्रणेच्या वापरातून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि जीवितहानी रोखणे हा राज्य शासनाचा हेतू निश्चितच साध्य होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कारण नसतांना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि सोबतींचेही प्राण जातात. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, देशातील रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेले आहेत. गेल्या वर्षभरात दुदैवाने महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी वायुवेग पथकांना अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेली ७६ वाहने उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या वाहनांच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण आणि बेशिस्त वाहतुक नियंत्रणात येईल. भविष्यात महाराष्ट्र अपघात रोखण्यात यश मिळेल. तसेच अपघाताच्या प्रमाणाबाबतीत राज्याचे स्थान खाली आणण्यासाठीही वाहनांचा उपयोग होईल. वायुवेग पथकाच्या माध्यमातून वेगवान आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येणार आहे.

वायुवेग पथक व वाहनांविषयी : 

राज्यामध्ये वाहन तपासणीसाठी परिवहन विभागाची एकूण ९२ वायुवेग पथके आहेत. राज्य रस्ता सुरक्षा निधीतून महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीची स्कॉर्पिओ S५ या मॉडेलची ७६ वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्पीड गन, ब्रेथ अॅनालायझर, व टींट मीटर उपकरणे, इंटिग्रेटेड कॅमेरे बसविण्यात आली आहेत.

Check Also

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *