Breaking News

वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी सायबर सुरक्षा महत्वाची बीएसईमध्ये ‘सायबर सिक्युरिटी कॉन्फरन्स-२०२० मध्ये तज्ञ मोहंती यांचे मत

मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ हा आता महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीचे सदस्य एस. के. मोहंती यांनी आज येथे केले.
सेबी, बाँम्बे स्टाँक एक्स्चेंज अर्थात बीएसई आणि महाराष्ट्र सायबर यांच्यावतीने ‘सायबर सिक्युरिटी कान्फरन्स-२०२० परिषदेचे आयोजन स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत मोहंती प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
बीएसईच्या सभागृहात आयोजित या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सायबरचे प्रमुख तथा विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, डिजीटल सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या – डिएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमा वेदश्री, एनसीआयआयपीसीचे महासंचालक अजित वाजपेयी, सर्ट-इनचे महासंचालक संजय बहल यांची बीजभाषणे झाली.
मोहंती म्हणाले की, वित्तीय संरचना आणि गुंतवणूक क्षेत्राच्या दृष्टीने सुरक्षेचे अनेकविध प्रय़त्न केले जात आहेत. सायबर हल्ल्यांपासून आणि विघातक शक्तींच्या हस्तक्षेपापासून भांडवली बाजार आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात विविध घटकांनी एकास्तरावर एकत्र येऊन माहितीचे आदान-प्रदान करणे आवश्यक आहे. सायबर हल्ल्यात गुंतलेल्या शक्तींपासून कुणीही सुरक्षित नाही. त्यामुळे ज्यांना अशा हल्ल्यांचा अनुभव आहे, अभ्यास आहे अशांनी ही माहिती स्वतःपुरती मर्यादीत ठेवता कामा नये. सायबर हल्ल्यांना परतावून लावणारी परिपुर्ण अशी प्रणाली अस्तित्वात नाही. तुम्ही तुमची प्रणाली जितकी अद्ययावत करत आहात, त्याहून अधिक प्रभावी प्रणाली विघातक शक्ती विकसित करण्यात पुढे राहू शकतात. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून, परस्पर सहकार्यातून भांडवली बाजार आणि सामान्यातील सामान्य गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सदैव सतर्क रहाणे आणि प्रय़त्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सेबीतर्फे सायबर सिक्युरिटी इंडेक्स अंतर्गत भांडवली बाजाराशी निगडीत डिपॉझीटरी, ब्रोकर्स, क्लिअरिंग हाऊसेस यांना सायबर सुरक्षेसाठीचे उपाय योजनांबाबत प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात ‘सायबर साक्षरतेसाठी विशेष प्रयत्न
महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह म्हणाले, सायबर सुरक्षा हा आता काळाची गरज असा विषय आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कित्येक शतकांपुर्वी आपण खैबर खिंडीतून परकीयांना प्रवेश देण्याची चूक केली होती. पण आता सायबर सुरक्षा हा सीमाकिंत विषय राहीलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणखी सतर्क आणि सज्ज व्हावे लागेल. विघातक शक्ती आपल्याकडे अस्तित्त्वात असलेल्या अद्ययावत सुरक्षा प्रणालींच्या पुढे जाऊन तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे व्यापक दृष्टीने आणि विविध घटकांनी एकत्र येऊन सर्वंकष असे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सायबर सिक्युरिटी क्रायसीस मॅनेजमेंटच्या उपाय योजना कराव्या लागतील. विघातक शक्तींचे हल्ले परतवण्यासाठी सुत्रबद्ध प्रयत्न करावे लागतील. यासाठी विविध घटकांपर्यत सायबर साक्षरता विषय पोहचविण्याची गरज आहे.
सायबर सुरक्षा क्षेत्रात गुंतवणूक
डिएससीआयच्या वेदश्री म्हणाल्या की, गुंतवणूक आणि वित्तीय क्षेत्रातील नियामक तसेच सुरक्षा क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र सायबर यांनी अशी परिषद आयोजित करणे हा अभिनव प्रयत्न आहे. भारत हा डिजीटल इकॉनॉमी आणि एक अर्थसत्ता म्हणून विकसित होणार देश आहे. यामुळे आपल्या वित्तीय सेवा क्षेत्र, भांडवली बाजार आणि फिनटेक उद्योग या क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. युपीआयमुळे डिजीटल पेमेंट प्रणालीच्या वापर वाढतो आहे. अशा बदलाच्या काळातच जोखीम वाढते. त्यामुळे आपल्या आर्थिक पायाला धक्का पोहचविण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळेच नियामक अशा यंत्रणांनी एकत्र येऊन सायबर सुरक्षेबाबत जागृती करणे आवश्यक ठरते. फायनान्शील डाटा त्यातही वैयक्तीक वित्तीय माहिती ही आता डाटा प्रोटेक्शन विधेयकाद्वारे संवेदनशील ठरविली जाते आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा क्षेत्रात गुंतवणूक करणे, कौशल्य वृद्धी करणे आवश्यक आहे असल्याचेही त्या म्हणाल्या.
सर्ट-ईनचे महासंचालक बहल म्हणाले, भांडवली बाजारातील गुंतवणूकदार, विविध कंपन्या आणि बाजाराशी निगडीत विविध घटक यांचा विश्वास दृढ रहावा यासाठी सायबर सुरक्षा हा महत्त्वपुर्ण विषय आहे. भांडवली बाजाराच्या सुरक्षेसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सुरक्षेतील कच्चे दुवे शोधण्याची प्रक्रिया आणि प्रयत्न सातत्याने करावे लागतील. यात संरचनेतील एखाद-दुसऱ्या घटकाची जबाबदारी नसून, अनेकांनी एका समानस्तरावर येऊन धोरण आखावे लागेल. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील परस्पर संबंध आणखी दृढ करावे लागतील. समन्वय, संवाद वाढवावा लागेल. वित्तीय संरचनेतील बँकांपासून विविध घटकांचा सक्रीय सहभागाला प्रोत्साहन द्यावे लागेल. याच प्रयत्नाचा भाग म्हणून जागतिक स्तरावरील एकशेऐंशी देशाच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमात सर्ट-इननेही सहभाग नोंदविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेस भांडवली बाजार आणि गुंतवणूक क्षेत्राशी निगडीत तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ, महाराष्ट्र सायबरचे वरीष्ठ पोलीस अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

गेल्या वर्षीच्या तुलनेत रिटेल व्यापारात ५ टक्क्याने वाढ सर्व्हेक्षणातून माहिती आली पुढे

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) च्या रिटेल बिझनेस सर्व्हेनुसार रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *