Breaking News

युवक व महिलांना उद्योजकता प्रोत्साहनासाठी महाराष्ट्र चेंबर व एम.एस.एम.ई मंत्रालय अभियान राबवणार

महाराष्ट्रातील युवकांना व महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरित करून त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबविण्यासाठी एम.एस.एम.ई खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शिष्टमंडळासह नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन यासंबंधीची संकल्पना मांडून प्रस्ताव सादर केले होते.

त्यानुसार हे अभियान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, एम.एस.एम.ई मंत्रालय भारत सरकार व उद्योग विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या २३ नोव्हेंबर च्या जयंती दिनापासून या अभियानास सुरुवात होईल व राज्यातील ३६ जिल्ह्यातील ७५ ठिकाणी या अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून व्यापार उद्योगातील नवीन संधी, त्यासाठी असलेल्या सरकारच्या योजना, अर्थ पुरवठ्यासाठीच्या उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या योजना, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाच्या योजना व्यापार, उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण यासंबंधीची माहिती या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच या अभियानांतर्गत उद्योग आधार योजनेखाली राज्यातील व्यापारी, उद्योगांची नोंदणी करण्याची मोहीमही हाती घेण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून किमान ५००० युवक व ५००० महिला नवीन व्यापार उद्योग सुरू करतील अशा प्रकारचे हे आयोजन केले असल्याची माहिती देऊन ललित गांधी पुढे म्हणाले की या अभियानामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यातील तरुण व महिलांना व्यापार उद्योगासाठी प्रेरणा मिळणार आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष संगीता पाटील, युथ विंगचे चेअरमन संदीप भंडारी एम. एस. एम. ई कमिटीचे चेअरमन आशिष नहार व अन्य पदाधिकारी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत असून, २३ नोव्हेंबर ते १५ मार्च या कालावधीत राज्यभरातील ५०००० युवक व महिलांच्या पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती ही ललित गांधी यांनी यावेळी दिली.यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात संदीप भंडारी, महाराष्ट्र चेंबर चे दिल्ली प्रतिनिधी जे.के. जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *