मुंबई: प्रतिनिधी
इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही पैशाचे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने आयएमपीएस द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. आता २ लाख रुपयांऐवजी तुम्ही एका दिवसात ५ लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. याशिवाय आता आरटीजीएस व्यवहार आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास ( 24X7 ) करता येणार आहेत. म्हणजेच तुम्ही RTGS द्वारे कोणत्याही वेळी ऑनलाइन पैसे हस्तांतरित करू शकता.
एनईएफटी व्यतिरिक्त ग्राहक आरटीजीएस आणि आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करू शकतात. आरटीजीएसद्वारे एका वेळी २ लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. तर जास्तीत जास्त रकमेची मर्यादा वेगवेगळ्या बँकांमध्ये भिन्न आहे. आयएमपीएसद्वारे एका दिवसात २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते, जी वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. आएनईएफटीद्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी किमान मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही कमीत कमी कितीही पैसे हस्तांतरित करू शकता. मात्र, जास्तीत जास्त पैसे पाठवण्याची मर्यादा प्रत्येक बँकांनुसार वेगवेगळी आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक शुक्रवारी पार पडली. आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के ठेवण्यात आला आहे.
व्याजदरात बदल न झाल्याने गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आता कमी झाली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्विमासिक तीन दिवसांची बैठक ६ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि ती ८ ऑक्टोबरपर्यंत चालली.
यावेळी बोलताना शक्तीकांत दास यांनी देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात अर्थात २०२१-२२ मध्ये ९.५ टक्क्यांवर राहील, असा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या तिमाहीत ७.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के असा विकासदर राहील, असं देखील शक्तीकांत दास म्हणाले. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी जीडपी वाढीचा अंदाज ९.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. यासह, आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.