मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच दिवसांपूर्वी चिंता व्यक्त करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे वित्त आयोगाने आपल्या प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर केले. मात्र या दोन दिवसात सरकारने चांगली बडदास्त ठेवताच वित्त आयोगाला उपरती होत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून प्रगतीपथावर घौडदौड करत असल्याचे प्रमाणपत्र दिले. तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यापेक्षा राज्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा निर्वाळा वित्त आयोगाने देत त्या वृत्ताचे खापर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोवर आयोगाने फोडले. त्यामुळे वित्त आयोगाने नेमका घुमजाव का केला असा प्रतिप्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मागील तीन दिवसांपासून राज्याचा वित्तीय आढावा घेण्यासाठी वित्तीय आयोग मुंबई दौऱ्यावर आला असून या तीन दिवसात राज्यातील विविध राजकिय पक्ष आणि राज्य सरकारच्या मागण्या आदी जाणून घेतल्या.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत विशेषतः गुजरात, कर्नाटक आणि तामीळनाडू राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची प्रगती चांगली आहे. तसेच देशाच्या आर्थिक स्थितीत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती महत्वाची भूमिका आहे. विकास कामांच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे आहे. परंतु महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाचा संतुलीत विकास झालेला नाही. त्यामुळे या दोन विभागाच्या विकासाच्यादृष्टीने विशेष लक्ष द्यावे लागणार असून त्याबाबतची शिफारस आयोग आपल्या अहवालाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील वाढत्या लोंढ्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. तसेच मुंबईच्यादृष्टीने ही एक समस्या बनत असून यावर वित्त आयोगाकडून विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा राज्याच्या वित्तीय व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.