कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून चार हजार पत्रे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवित लक्ष वेधलं. मात्र, तरीदेखील मराठी भाषा आणि मराठी व्यक्तीची पीछेहाट होत असून इतर भाषांच्या हस्तक्षेपामुळे मराठी भाषा मृतवत होत असल्याचं नेहमीच बोलले जात आहे. यासंदर्भात आता मराठी भाषेचा कायम आग्रह धरणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी टिकवण्यासाठी आधी मराठीत बोलणं गरजेचे असून मराठी बोलताना लाज वाटायची गरज नसल्याचे मत व्यक्त केले.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुष्पा चित्रपटाबाबतही बोलताना म्हणाले की, ‘पुष्पा’ चित्रपट जेव्हा हिंदीत आला नव्हता. तेव्हा तुमच्यातले आणि माझ्या काही ओळखीच्या लोकांनी तेलगूमध्ये पुष्पा पाहिला. माझा एक मित्र आला आणि म्हणाला पुष्पा, मला पहिले कळलं नाही कारण मला ते काय आहे हे माहित नव्हतं, तेव्हा तो चित्रपट नुकताच आला होता. तो मला म्हणाला की पुष्पा चित्रपट बघ आणि तेलगू चित्रपट आहे. मी म्हणालो, तू तेलगूत पाहिला. तर चित्रपटाला भाषेची गरज नाही असं त्याने सांगितलं. चित्रपट पाहिल्यावर मला कळलं की भाषेची गरजच नाही त्याला.
पुढे राज ठाकरे म्हणाले, मला असं म्हणायचं आहे. तुम्ही तुमच्या गोष्टीवर ठाम राहा ना. त्यांनी नंतर त्या लोकांनी पैशांचा व्यवहार केला आणि चित्रपट हिंदीत आणि इतर भाषेत आणला वगैरे.