मराठी ई-बातम्या टीम
हिंदी, मराठीसह देशातील जवळपास ३६ भाषांमध्ये आपल्या सुरेल आवाजाच्या आणि गायकीच्या बळावर अढळस्थान निर्माण करणाऱ्या लता मंगेशकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अखेर निधन झाले. त्यांना कोविडची लागण झाली म्हणून ८ जानेवारी २०२२ रोजी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास २८ दिवस त्यांची मृत्यूबरोबर झुंज सुरु होती. परंतु अखेर आज सकाळी ८.१२ मिनिटांनी त्यांची झुंज संपल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.
त्यांच्या पश्चात बहिण आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर असा परिवार राहीला आहे. लता मंगेशकर या चार बहिण आणि भावा मध्ये वडील होत्या. त्या शेवटपर्यत अविवाहीत राहील्या.
त्यांनी गुलजार दिग्दर्शित किनारा चित्रपटात “नाम गुम जायेगा, चेहरा ये गुजर जाऐगा मेरी आवाजही ही मेरी पेहचान है” गाणे गायले होते. या गाण्यातील शब्दाप्रमाणेच त्यांचे जीवन आता अजराअमर बनले आहे. तसेच त्यांनी गायलेली जवळपास सर्वच गाणी पाच दशकातील पिढ्यांच्या तोंडी आजही सहज गुणगुणली जात आहेत. हेच त्यांच्या गायकीचे श्रेय आहे.
त्यांचे पार्थिव १२.३० वाजता त्यांच्या पेडर रोडवरील प्रभूकुंज येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लता मंगेशकर यांच्या घरातील नोकराला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा संसर्ग लता मंगेशकर यांना झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना ८ जानेवारी रोजी ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर होती. तसेच त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसादही मिळत होता. मात्र काल अचानक त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांनंतर जवळपास दोन ते तीन वेळा त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत राहीली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांकडून संदेश देत प्रार्थना केली. परंतु त्यांच्या प्रार्थनेला यश आले नाही.
लता मंगेशकर यांनी जवळपास पाच दर्शकाहून अधिक काळ पार्श्वगायन केले. या पाच दशकाच्या काळात स्व. अभिनेत्री नर्गिस, मीनाकुमारी, नूतन यांच्यासह काल परवा पर्यंत अर्थात कोंकणासेन शर्मा यांच्यापर्यत त्यांनी अनेकांना आपला आवाज दिला. जवळपास ५० हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली.
त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण अशा सर्वाच्च सन्मानानंतर सर्वोच्च किताब भारतरत्न ने गौरविण्यात आले. त्यांच्या सुरेल आवाजाचे फक्त देशभरातच नव्हे तर परदेशातही अनेक चाहते आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून वाढत्या वयामुळे त्यांनी गाणं गाणे जवळपास थांबविले होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी ब्रीच कॅण्डी रूग्णालयात जावून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.