मागील काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून विविध मत-मतांतरे पहायला मिळत असताना आणि या चित्रपटावरून राजकारणालाही सुरुवात झालेली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य करत आणखीन भरच घातली आहे. यापार्श्वभूमीवर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत नाना पाटेकर यांनी या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमास नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. तो पाहिला असता तर मला सांगता आलं असतं. पण एखाद्या चित्रपटाबद्दल असा वाद होणं बरोबर नाही असे ते म्हणाले.
१९९०मध्ये काश्मीरमधून काश्मिरी पंडितांना आपली घरं-दारं सोडून बाहेर पडावं लागल्याच्या घटनेचं चित्रण करणारा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आणि काहीसा वादात सापडला आहे. या चित्रपटातल्या विषयावरून देशात समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा, असे म्हटलं असताना तो टॅक्स फ्री करण्याची मागणी होऊ लागली आहे. दुसरीकडे काही राज्यांनी याला विरोध केला आहे. त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.
मला वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच राहावे. गट होत असतील तर ते चुकीचं आहे. मला वाटतं की ही तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाही. ही तेढ कुणी जाणूनबुजून निर्माण करत असेल, तर त्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारा. सगळे छान सलोख्यानं राहात असताना मध्येच कुठेतरी बिब्बा घालायचा याची काही गरज नाहीये. चित्रपट आहे तो तसाच पाहावा. त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना पटणार नाही. त्यामुळे त्यावरून गट पडणं साहजिक आहे. पण म्हणून त्यावरून समाजात तेढ निर्माण होणं हे योग्य नसल्याचे मतही नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
आपल्याला एकमेकांचा आधार वाटणे गरजेचे आहे. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असं जोपर्यंत दोन्ही समाजांना, तुम्हा-आम्हा भारतीयांना वाटत नाही, तोपर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील. परदेशी व्यक्तीचा विषय आला की सगळे लगेच भारतीय होतात. मग अशावेळी जात-धर्म का आठवतात? त्यामुळे सर्वांनी आपण भारतीय आहोत एवढंच मानून चालायचं असेही ते म्हणाले.
