मुंबई : प्रतिनिधी
शेतकर्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषी विधेयक शेतकर्यांच्या फायद्याचं आहे असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपले मत व्यक्त केले आहे.
पवारसाहेब कालच राष्ट्रपतींना भेटले आहेत. त्यावेळी साहेबांनी या विधेयकावर काय केले पाहिजे हे सविस्तर मांडले आहे. केंद्रातील वरीष्ठ मंत्री शेतकर्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत. परंतु तोडगा अजून निघत नाही. केंद्र सरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे, मात्र काय करणार ते स्पष्ट करत नसल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील शेतकरी हे विधेयक रद्द करा अशी भूमिका मांडत आहे. यामध्ये विरोधी पक्षांना राजकारण करायचं नाही. आज थंडीच्या दिवसात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. तर मत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू हे शेतकर्यांना घेऊन दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची मागणी येते त्यावेळी केंद्राने हटवादीची भूमिका बाजूला ठेवून समंजस भूमिका घेतली पाहिजे. १०० टक्के सर्व गोष्टी आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा हे लोकशाहीत चालत नाही याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला.