मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र राज्यात अशांतता पसरवी यासाठी शेतकरी नेत्यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यात जी शेतकऱ्यांची अवस्था आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार कारणीभूत आहे. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला आघाडीचे नेतेच जबाबदार आहेत. युती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मात्र राज्यात अशांतता पसरविण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
युती सरकारने मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार हि योजना राबवल्यामुळे राज्यात कृषी उत्पन्न वाढले असून त्या कृषी उत्पन्न चांगला दर देण्याचे आव्हान सरकारपुढे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केले. ज्या शेतकऱ्यांनी तूर आणि हरभऱ्याची नोंदणी केली आहे . मात्र त्यांची खरेदी झाली नसल्यास त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.