Breaking News

मुख्यमंत्र्यांना सोलापूरची डाळींब पाहताच होते खायची इच्छा

‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांशी हितगुज

मुंबई : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळींब सोबत आणले होते. ते पाहून मुख्यमंत्री म्हणाले, डाळींब खूप छान दिसताय. पाहताच खायची इच्छा होतेय अशा स्पष्ट शब्दात सोलापूरी डाळींबला पाहताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या डाळींबीबाबत असलेली आवड शेतकऱ्यांना सांगितली.

शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या  ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मांडल्या. सुमारे तीन तास मुख्यमंत्री राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगत मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलासा देत होते. त्यावेळी सोलापूरच्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी आणलेली डाळींब पाहून मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले.

सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांसोबत संवादाला सुरुवात केली. शेतकरी बांधवांच्या जीवनात कष्टाने पिकविलेल्या तीळ आणि उत्पादित केलेल्या गुळाचा गोडवा कायम रहावा, अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी चर्चेला सुरुवात केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुक्तपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे तसच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल.  २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली १६ हजार गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे ३४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे.

राज्यात १ लाख ३७ हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत १ लाख ३० हजार सिंचन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. कृषी यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यासाठी ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान ५ लाख शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ट्रॅक्टरचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. ८ हजार पेक्षा जास्त पॉवर टीलर्स व ४५ हजार पेक्षा जास्त यांत्रिक अवजारे वितरित केली आहेत.

राज्यातल्या ग्रामीण भागाचं चित्र बदलण्याची क्षमता असलेला एक मोठा प्रकल्प आपण हाती घेतला आहे. जागतिक बँकेनं त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपये गुंतवण्याचे मान्य केलं आहे. “महाराष्ट्र राज्य कृषी-व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन” (स्मार्ट) याद्वारे शेतमाल विक्रीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, उपलब्ध सुविधांचं  आधुनिकीकरण व बळकटीकरण करणं, शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती करणं आणि शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणं या गोष्टी करणार आहोत.

राज्य शासन योजना आखतं, तसेच त्याची अंमलबजावणी करतं. या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना खरोखरचं किती लाभ मिळाला आहे हे समाजवून घेणं, जर काही अडचणी आल्या असतील तर त्या कशा दूर करता येतील याची माहिती घेणं हे महत्वाचं वाटतं. म्हणून मी आपल्याशी संवाद साधत आहे. दुष्काळी परिस्थितीची झळ जास्त बसलेल्या मराठवाड्यापासून आपण चर्चेला सुरुवात करुया, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी सर्वप्रथम चर्चा केली.

यावेळी शेतकऱ्यांनी शेततळ्यांमुळे उत्पादन वाढीस लागल्याचे सांगतानाच उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवली नाही. जिथे पिण्यासाठी पाणी नव्हते तेथे आता ऊस, द्राक्षासारखी पिके घेतोय, असे सांगत बहुतांश शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजना वरदान ठरल्याचे सांगितले. सोलापूर येथील बिराजदार आजोबा आपल्या शेतात तयार केलेल्या शेततळ्याच्या काठी बसून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत होते. ‘साहेब, तळ्यातील पाण्याचे जलपूजन व्हायचे आहे, आपण रिमोटद्वारे बटन दाबून जलपूजन करावे,’ अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करताच रिमोटचे बटन दाबून मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन जलपूजन केले. पालघर जिल्ह्यातील गणपत गावंडा यांनी अनुभव कथन करताना मुख्यमंत्र्यांना दुर्गम भागातील शेतीच्या सपाटीकरणाबाबत अडचण सांगितली. ती ऐकून ज्या भागात शेतीचे समतलीकरण करता येत नाही अशी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तातडीने विभागाला दिले.

गटशेतीला राज्य शासनाने चालना दिल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहे. पालघर येथे पाच हजार शेतकरी गट तयार झाल्याचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. गटशेतीमुळे शेतकरी एकत्रित आल्यावर जी शक्ती निर्माण होते त्याचा फायदा मिळतो आणि एकरी उत्पन्न वाढीतही त्याचे लाभ मिळतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी गटांनी मेगा फूड पार्क योजना राबवावी. त्याला शासनातर्फे अनुदान दिले जाईल. नाशवंत मालावर प्रक्रिया केल्यावर त्याला भाव देखील चांगला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अनुदानासाठी कोणाला पैसे द्यावे लागतात का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीच्या कुठल्याही अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. ऑनलाईनमुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादन, शेततळे, कृषी यांत्रिकीकरण, कर्जमाफी यासह शेतमालाला बाजारभाव, फुलशेती,सेंद्रीय शेती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल केले. त्याचा फायदा राज्यातील अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यात लवकरच एक लाख सौर ऊर्जा पंप वाटपास सुरुवात करण्यात येणार असून शेतीला वीज पुरवठा करणारे सर्व फिडर सौर ऊर्जेवर चालणारे करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सुमारे तीन तास मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्षात बोलायला संधी मिळाली याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. तळागाळातील शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधला, आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया जालना जिल्ह्यातील वरुड येथील दीपक म्हस्के यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांशी संवाद साधणारे मुख्यमंत्री आम्हाला पुढेही लाभो, अशी इच्छा गोंदियातील बाबुलाल गौतम यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी थेट शेतातल्या बांधावरुन शेतकऱ्यांनी सहकुटुंब संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी देखील संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांना आवडतो हातसडी तांदळाचा भात

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी आपल्या भागातील चिकू, नारळ, पपई, पेरु या फळांसोबतच विविध भाज्या आणि फुलांची माहिती देत होते. माझ्या घरी पालघर जिल्ह्यात पिकणारा हातसडीचा तांदूळ मी नेहमी आणतो. या तांदळाचा भात पौष्टिक असतो. तो मला आवडतो, असे कौतुकाचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढताच पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आनंद अवर्णनीय होता.

टोपलंभर पेढे पाठवतो …

संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट विक्रीसाठी आणता येतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान परभणी येथील प्रताप काळे या शेतकऱ्याने आपला अनुभव सांगताना आज माझ्यासाठी दिवाळी असल्याचे सांगत काल आठवडे बाजारात मी नेलेल्या वांग्यांना चांगला भाव मिळाला. मला हजार रुपये एक दिवसात मिळाले. माझ्यासाठी ही दिवाळीच, असे सांगताना प्रताप यांनी मुख्यमंत्र्यांना टोपलभर पेढे देतो, असे उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी दिली.

बीई एमबीए झालेली तरुणी शेतीकडे वळली

गोंदिया जिल्ह्यातील राणू रहांगडाले या तरुणीने बीई इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले. एमबीए केले. मात्र ती शेतीकडे वळली. आता सध्या ३५ एकर शेतीवरील भाजीपाल्यासह पपई, केळी यांचे उत्पादन घेते. स्ट्रॉबेरी पिकविते. यासाठी तिने सिंचन योजनांचा लाभ घेतला. शेती करताना शासनाच्या विविध योजनांमुळे कसा फायदा झाला. हे अनुभव सांगताना राणूने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राणूच्या शेती व्यवसायाकडे वळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. उच्च शिक्षित असूनही शेती करताय याबद्दल तुमचे अभिनंदन असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

ऑनलाईन जलपूजन

सोलापूर जिल्ह्यातील बोरमणी येथील सिद्धराम बिराजदार या शेतकऱ्यांने मुख्यमंत्र्यांना शेततळ्यातील पाण्याचे जलपूजन रिमोटचे कळ दाबून करावे, अशी विनंती केल्यानंतर त्याला मान देत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम सुरु असतानाच रिमोटची कळ दाबून जलपूजन केले. अशा प्रकारे ऑनलाईन जलपूजन करण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच उपस्थितींना हसू आवरले नाही.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *