मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झीट आणि ओपिनियन पोलमध्ये भाजप पुरस्कृत रालोआला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भाजपच्या राज्य आणि केंद्रामधील भाजप नेत्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असले तरी २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाच्या दिवसापर्यत पक्षाच्या संकल्प विजयावर शिक्कामोर्तब होण्याची वाट पहावी अशी सावध प्रक्रियाही व्यक्त करण्यात येत आहे.
मागील ५ वर्षात भाजप प्रणित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कारभारामुळे जनमानसात एकाबाजूला नाराजी तर दुसऱ्याबाजूला कौतुक करणारेही होते. परंतु निवडणूकीचा कालावधी जसा जसा जवळ येवू लागला तसा लोकांच्या मनामनातील नाराजगीची जागा भाजपच्या बाजूच्या कलाने घेतली. त्यामुळे अनेक भागात भाजप विरोधी वातावरण असूनही शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पारड्यात जनतेने माप टाकल्याचे दिसत असल्याची प्रतिक्रिया भाजपमधील एका नेत्याने व्यक्त केली.
तर दुसऱ्याबाजूला निवडणूकीच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पर्धेत तुल्यबळ उमेदवार काँग्रेस प्रणित आघाडीकडे नसल्याने मोदींशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे नागरीकांनीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याऐवजी मोदीं अर्थात भाजपाला जवळ केल्याचे सांगितले.
एक्झीट पोल आणि ओपिनियन पोल नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर झालेल्या पोलचे स्वागत करत केंद्रात भाजप-पुरस्कृत आघाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार निश्चित स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मागील पाच वर्षात भाजप सरकारने केलेल्या चांगल्या कामामुळे जनता आमच्याच पाठीशी उभे राहणार असून केंद्रात आम्हीच सरकार स्थापन करू असा विश्वास व्यक्त केला.
संघाचे नेते गडकरींच्या भेटीला
देशात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचा विजय होणार असल्याचे दूरचित्रवाहीन्यांवरील एक्झीट आणि ओपिनियन पोलनंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने नेते भैय्याजी जोशी आणि भाजपचे केंद्रीय कैलास विजयवर्गीय यांनी नागपूरात जावून नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत पुढील राजकिय घडामोडींच्या अनुषंगाने चर्चा केली.