Breaking News

प्लास्टीक मुक्तीसाठी पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांचा असा प्रयत्न गड-किल्ल्यावरून प्लास्टीक हटाव मोहीम

मुंबईः मनस्वी म्हात्रे
अशी कोणती जागा नाही जिथे प्लास्टिकचा खच पडलेला नाही, गड-किल्ले, नद्या-समुद्र आणि जंगलंही याला अपवाद नाहीत. किंबहुना या ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर करून पर्यावरणाला धोक्यात आणण्याचे काम होताना दिसते, पण या प्रवृत्तीला छेद देत एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यास जाणारा समूह करत आहे. या इथेही पर्यावरण मंत्र्यांचा वेगळ्या पद्धतीने हातभार लागतोय, या कार्यात त्यांच्या खाजगी सचिवांनी आणि त्यांच्या मित्र सरकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे, आणि आता ही मोहीम चळवळ बनू पाहत आहे.
गड-किल्ल्यावर अगदी कुठे डोंगरावरही गेलो तरी प्लास्टिकच्या बाटल्या आणि विविध खाद्यपदार्थ घेऊन गेलेल्या किंवा स्नॅक्स असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसतो..आतापर्यंत स्वाभाविक वाटणारी ही गोष्ट..फिरायला जायचे आणि त्याठिकाणी प्लास्टिक कचरा निर्माण करायचा ही सवय सर्व थोरा-मोठ्यांच्या अंगवळणी पडली आहे. पण राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय झाल्यावर काही बदल घडताना दिसत आहेत. पर्यावरणप्रेमी जाणीवपूर्वक अनेक स्तरावर यासाठी प्रयत्नशील आहेत. ट्रेकिंगच्या साहसाचा आनंद घेत सामाजिक जाणिव ठेवून नव्याने सुरू झालेली ही चळवळही अनेकांना प्रोत्साहित करत आहे.
तर सुरुवात अशी झाली की, आवड म्हणून किंवा साहस हाच छंद असलेल्या एका ट्रेकर्सच्या समूहाने प्लास्टिक विरोधी ही चळवळ सुरू केली. गड-किल्ले-डोंगर-दऱ्या कुठलीही भ्रमंती करताना प्रत्येकजण आपल्या ग्रुपसोबत जातो. प्लास्टिक बंदीचा निर्णय झाला तेव्हा राज्यात मोठी चर्चा सुरू होती. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष निर्णय घेतला गेला, तिथे अर्थातच प्रचंड विचारमंथन झालं आणि प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय झाला, या एकूण प्रक्रियेचा प्रत्यक्ष भाग असलेले पर्यावरणमंत्र्यांचे खाजगी सचिव गिरीजाशंकर पोपळघट, हे नेहमी आपल्या मित्र-समूहासोबत ट्रेकिंगला जातात. त्यांच्या समूहात इतर मित्रांसोबतच बहुतेकजण सरकारी वरिष्ठ अधिकारी मित्र असतात. त्यावेळी प्लास्टिक आणि दुष्परिणाम हाच विषय सतत चर्चेत असल्याने समूहातही स्वाभाविकपणे हा मुद्दा केंद्रस्थानी होता. त्याच दरम्यान व्यस्त कार्यक्रमातून वेळ मिळल्यावर नेहमीच्या नियोजनाप्रमाणे ट्रेकिंगला गेल्यावर गड-किल्ल्यावरील प्लास्टिक कचरा नजरेच्या समोर येत राहिला आणि या मोहिमेने जन्म घेतला. गड-किल्ले सर करताना पडलेला प्लस्टिकचा खच उचलायचा आणि परतताना तो खाली आणून संबंधित स्थानिक संस्थेच्या हवाली करायचा किंवा तसे शक्य नसल्यास त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लागेल अशी व्यवस्था करायची. प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू झाल्यापासून जेव्हा ट्रेकिंगला जायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा हे काम होत गेले आणि आता हे काम अंगवळणी पडले आहे. त्याच दरम्यान समूहाने फिरायला आलेले या ग्रुपचे अनुकरण करताना दिसले आणि इतर जे या कामात मदत करत नाहीत ते किमान प्लास्टिक आणि इतरही कचरा टाकला जाणार नाही याची खबरदारी घेतात. आता प्रत्येक ठिकाणी ही मोहीम फिरण्याच्या आनंदाचा भाग झाली आहे. याबाबत पर्यावरण मंत्र्यांचे खाजगी सचिव गिरीजाशंकर पोपळघट सांगतात,” मला ट्रेकिंगची आवड आहे, जेव्हा संधी मिळते तेव्हा मी गड- किल्ल्यांना भेट देतो. प्लास्टिक बंदीचा निर्णय प्रक्रिया सुरू होती. तेव्हाही गड-किल्ल्यावर पडलेला कचरा माझ्या नजरेसमोर येत असे. त्याच दरम्यान जेव्हा फिरायला गेलो तेव्हा गड-किल्ले शक्य होईल तेवढे प्लास्टिक मुक्त करण्याच्या कामाला आम्ही सर्वांनी सुरुवात केली..आपण केवळ बोलण्यापेक्षा आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावर लोक त्यात सहभागी होतात, हा माझा अनुभव आहे आणि इथेही तसेच झाले.” पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही या कामाचे कौतुक करत, गड-किल्ल्यावर जाणारेच नव्हे तर सर्वच पर्यटकांना पर्यावरण वाचवण्याच्या कामात अशा मदतीचे आवाहन केले आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *