नवी दिल्लीः प्रतिनिधी
देशाच्या अर्थव्यवस्थेला दिवसेंदिवस घरघर लागत असून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोसपणे काही तरी करण्याची गरज असून केंद्र सरकारने याकडे पहावे असे आवाहन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केंद्राला करत नाही तर लाखो बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त केली. ते एका खाजगी कार्यक्रमात बोलत होते.
मागील ७० वर्षात अशी परिस्थिती देशाच्या अर्थव्यवस्थेत कधीच आली नव्हती. मात्र तशी कठीण वेळ सध्या आलेली आहे. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची गरज आहे. या क्षेत्रातील लाखो कामगारांनावर बेकार होण्याची पाळी येण्याची शक्यता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कठीण काळ सुरु असून देशात आर्थिक मंदी पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उद्योगातील ज्या ज्या क्षेत्रात मंदीचे सावट आहे, त्या क्षेत्रात केंद्राने तातडीने तात्पुरत्या किंवा ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
नीती आय़ोगाच्या उपाध्यक्षांनीच देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत काळजी व्यक्त केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून सांगण्यात येत असलेल्या अर्थव्यवस्थे सशक्तीकरणाचे बींग फुटल्याची चर्चा सुरु झाली आहे.