बीड: प्रतिनिधी
जालना, परभणी व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पावसाने हाती आलेले पीक वाया गेलेल्या पीकाची मोळी घेवून व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला जयंत पाटील यांनी दिलासा देत आधार देण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचा विभागीय आढवा घेण्यासाठी जयंत पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळपासून या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पक्षाची बैठक थोड्या उशिरा आयोजित करत जयंत पाटील यांनी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आम्ही करत आहोत. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जायकवाडी धरणावर देखील आमचे लक्ष आहे असेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला याची माहिती घेऊन पुढे काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज घेतला जात असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत
जलसंपदा विभाग कालपासून सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. नुकसान कमीत कमी व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. मांजरा धरणाची देखील दारे उघडण्याची स्थिती उद्भवली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असल्याचे त्यांनी सांगत जयंत पाटील यांनी आश्वासित केले की घाबरु नका… तुमच्या बरोबर सरकार आहे असा धीरही दिला.
पीकाची मोळी घेऊन अंबाजोगाईतील शेतकऱ्याने लहानग्या नातवासह घेतली भेट…
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यानंतर हैराण झालेल्या अंबाजोगाई येथील वयस्क शेतकऱ्याने आपल्या लहानग्या नातवासह हातात नुकसानीची मोळी घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. अंबाजोगाई येथील आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत या वयस्क शेतकर्याने भेट घेतली. गेले तीन दिवस मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची बैठक सुरू असताना पावसाने नुकसान झालेली मोळी घेऊन डोळ्यात अश्रू दाटलेल्या या शेतकर्याने भेट घेतली. हातात नुकसानीची मोळी घेऊन आलेल्या त्या शेतकऱ्याचे म्हणणे जयंत पाटील यांनी ऐकून घेतले व त्यांना घाबरु नका सरकार तुमच्या सोबत आहे असा धीराचा शब्द दिला. केंद्र सरकारच्या कृपेने आधीच सोयाबीनचे भाव पडले आहेत आणि त्यात आता ही निसर्गाची अवकृपा झाली असून सर्वत्र पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे जयंत पाटील सांगितले.
दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री धनंजय मुंडे हे करत असल्याचेही जयंत पाटील यांनी त्या शेतकऱ्याला सांगितले. शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन आपले कर्तव्य पूर्ण करत आहे अशा शब्दात त्या शेतकऱ्याला जयंत पाटील यांनी दिलासा दिला.dhan