मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
सातवी राष्ट्रकुल संसदीय परिषद १५जानेवारी ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या आयोजनावर होणारा करोडो रुपयांचा खर्च टाळून जास्तीत जास्त निधी दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यावर राज्य सरकारने भर देण्याची आवश्यकता आहे. राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पिण्याचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त निधीची आवश्यकता आहे. सरकार दुष्काळग्रस्तांसाठी भरीव मदत पोहचवण्याऐवजी इतर कार्यक्रमावर निधी खर्च करत आहे. हे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जानेवारीत आयोजित करण्यात आलेली राष्ट्रकुल संसदीय परिषद रदद् करावी अशी मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र पाठवून केली.