मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने फक्त मराठवाड्यात पाहणी केली. या चमूला विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने केल्या. त्यामुळे हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडे असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली असून सर्वच बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सत्तेवर येण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. मात्र आमचं सरकार सत्तेवर आल्यास शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांप्रमाणेच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देऊ असे खोटे आश्वासन दिल्याची टीका त्यांनी केली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होईल. शिवाय मित्रपक्षांनाही सोबत घेतलं जाईल. जागावाटपासंदर्भात कुठलाच संभ्रम नाही. असल्यास तो दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून सोडवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने वाटाघाटीही सुरू आहेत. महागठबंधनानंतर जागावाटप करताना ज्या राज्यात ज्या पक्षाची ताकद अधिक आहे, त्याला अधिक जागा दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.