अमरावती-मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेसच्या काळात रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले का करते, रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे? हे सगळं माहित आहे. पण ते आमच्यावर आरोप करतायत की रझा अकादमी आमची बी टीम आहे म्हणून, चला आम्ही मान्य करतो मग तुम्ही घालणार का बंदी? आहे का? काँग्रेसमध्ये हिंमत असा उपरोधिक असा सवाल काँग्रेस आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर असून त्यांनी हिंसाचारात नुकसान झालेल्या भागांना भेट दिली. तसेच नागरीकांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही त्याची खोटी माहिती सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली. देशभरात समाजाला भडकाविण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवसात राज्याच्या वेगवेगळ्या भागात काढण्यात आले. हे मोर्चे नियोजित होते. खोट्या माहितीच्या आधारे मोर्चे कोणी आयोजित केले याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी करत महाराष्ट्रात आणि देशात अराजकता निर्माण करण्याचा कोणाचा उद्देश होता का? याचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
मध्यंतरी त्यांनी आशिष शेलारांचे रझा अकादमीतील पदाधिकाऱ्यांचे जुने फोटो दाखविले. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे, शरद पवारांसोबतचे फोटो का दाखविले नाहीत असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांना विचारला.
तसेच यावेळी त्यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीकेची झोड उठवित म्हणाले की, १२ तारखेला अमरावतीत ज्या दंगली झाल्या. त्यावर पालकमंत्री का बोलत नाहीत. त्यांना मते कमी होण्याची भीती असल्याने त्या बोलत नाहीत का? राज्यात दंगली भडकाविण्याचा कट होता का? याचीही चौकशी करण्याची गरज असून या मोर्चाला कोणी परवानगी दिली, देणारा कोण होता, ज्याने परवानगी दिली त्याने काय विचार करून परवानगी दिली? त्याची चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी मागणी केली.
त्या मोर्चाच्या परतीच्यावेळी विशिष्ट धर्माच्या लोकांच्या दुकानांना टार्गेट करण्यात आले. लोकांना टार्गेट केले. यातून दंगा घडविण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.