मुक्ताईनगर: प्रतिनिधी
भाजपाच्या केंद्रातील असेल किंवा राज्यातील पक्षनेतृत्व करणाऱ्यांच्या विरोधात माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मात्र आज भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहे. ते केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमुळे असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
मी मंत्री पदावर असताना राज्याच्या विधिमंडळात किंवा बाहेर कोणत्याही राजकिय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही. तरीही माझा राजीनामा घेतला गेला. त्यानंतर माझ्या विरोधात वेगवेगळ्या चैौकशा लावण्यात आल्या. त्या सर्व चौकशातून मी सही सलामत निर्दोष म्हणून बाहेर आलो. तरीही फडणवीस यांनी कोणत्या तरी एका स्त्रीला हाताशी धरून माझ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला. याबाबत विचारणा केली तर ते म्हणाले ती बाई फार गोंधळ घालते त्यामुळे ही खोटी केस करायला लावली. परंतु ती आपण नंतर काढून घेणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र ती केस न्यायालयात चालली. त्यातून निर्दोष सुटलो. अशा खोट्या गुन्ह्यामुळे मला मानसिक त्रास फार झाला. त्यामुळेच आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
मंत्री पदावर असताना माझ्यावर ९ महिने पाळत ठेवली. का तर म्हणे तो पीए माझ्यासाठी काम करत होता म्हणून यासारख्या अनेक गोष्टी त्यावेळी करण्यात आले. माझं निर्दोषत्व जाहीर करा म्हणून मी अनेकवेळा आवाहन केले. परंतु ते काही कधी केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.