मुंबई: प्रतिनिधी
गुलाब चक्रीवादळामुळे विशेषत: मराठवाड्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फटका बसला असून येथील लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेली पीके गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द देत धीर सोडू नका असे आवाहन केले. त्या आवाहनाचा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही तर प्रत्यक्ष आणि तातडीच्या मदतीची गरज असल्याचे सांगत ही मदत तातडीने पोहोचविली जावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरून राज्य सरकारला सूचना केली.
राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळे आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नसल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
यंदाच्या पावसाळ्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची आकडेवारी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे असल्याचे म्हणाले.
कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांमुळे शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. #MaharashtraRains #Marathwada
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 29, 2021
आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे. #MaharashtraRains
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 29, 2021