मुंबई : प्रतिनिधी
मंत्रालयात मे २०१८ पर्यंत झालेल्या १०७ लोकशाही दिनांमधील एकही अर्ज प्रलंबित नसून १ हजार ४७० तक्रारींवर तोडगा काढण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १०८ वा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी ११ तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी सुनावणी केली.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित केले जाते.आतापर्यंत एकूण १०७ लोकशाही दिन झाले असून १४७० तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या वेळीच निकाली काढल्याने मे २०१८ अखेरपर्यंत प्रलंबित अर्जांची संख्या शुन्य आहे. आज झालेल्या लोकशाही दिनात सातारा, वसई, कांदिवली, पुणे, ठाणे जळगाव, बुलढाणा, वेंर्गुला येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मांडली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.