मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी खाटांची संख्या कमी पडू नये यासाठी राज्यातील सर्वच शासकिय आणि खाजगी रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले. या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली.
· १३ मार्च २०२० च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा १८९७ लागू केला.
· उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १३ मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.
· १४ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम २०२० अधिसूचना लागू झाली. त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत.
· गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
· आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
· वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गेल्या काही दिवसात विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा, विविध परिषदांच्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिक, सुश्रुषा सेवा, परावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या सेवा अधिग्रहीत करणे.
· कोरोन विषाणुच्या अनुषंगाने सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत / कक्ष निर्माण करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणे.
· कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतुकीकरण करणे.